अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने सारबेटे येथील चिखली नदीला पूर आल्याने ढेकू मार्गे जळगाव जाणारी वाहतूक टाकरखेडे मार्गे वळवण्यात आली. यामुळे अनेकांचे हाल झाले.
अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथे चिखली नदीवर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक पुलाच्या खालच्या बाजूने वळवण्यात आली होती. मात्र जोराचा पाऊस झाल्याने चिखली नदीला पाणी आले. संभाव्य धोका पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिनेश पाटील यांनी वाहतूक टाकरखेडे मार्गे वळवून पाण्याला प्रवाह मोकळा करून दिला. त्यांनंतर त्यांनी वाहतूक सारबेटे गावातूनच वळवली.पावसाळ्यात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून पुलाचे काम होईपर्यंत सारबेटे गावातून वाहतूक वळवण्यासाठी रस्ता नीट तयार करून दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.